मृगाचे मनःपुर्वक स्वागत

ऑफिसमधे काम करत असतांना सहज नजर वर गेली आणि दिसलं की आकाशाच्या एका कोप-यात सूर्य, आपलं देखील अस्तित्व आहे असं काहितरी त्या काळ्या काळ्या मोठाल्या ढगांना सांगायचा प्रयत्न करतोय, काय प्रकार आहे बघावं म्हणून जागेवरून उठुन खिडकीपाशी गेले तर दिसलं की संपूर्ण आकाश काळ्या-निळ्या ढगांनी अगदी गच्च भरून आलंय आणि आता कधीहि पावसाला सुरूवात होईल....हे सगळं बघुन कुठेतरी मनात तुझा विचार चमकला आणि का काय माहित खुप हुरहूर वाटायला लागली....अगदी एकटं असल्याचा भास झाला...आजची संध्याकाळ खूप अवघड जाईल सरायला असं वाटायला लागलं...आणि अचानक एक विचार चमकला, ह्या वेळेला कातरवेळ का म्हणतात हे उमगलं, तू भेटू नाही शकत हे दिवसभर मनाला समजावून सांगितलं तरीहि त्याचं वाट बघणं आणि त्या वाट बघण्यात संध्याकाळचे चार तास चौपट झाल्यासारखं वाटणं ही सगळी प्रक्रिया काळिज चिरत जाते आणि आपल्याला ह्या धार-धार कात्रिला कुठेही थांबवता येत नाही!!! आह!!!

अजुन मी खिडकीपाशीच उभी होते...मधल्या वेळेत सूर्य कधी अस्ताला गेला आणि उरलं-सुरलं आकाशही त्या ढगांनी व्यापुन गेलं कळलंच नाही आणि बघता बघता पाउस सुरू पण झाला...पहिला पाउस!! एक मन अगदी लहान मुलाप्रमाणे उडया मारत होतं आणि दुसरं मन तुझ्या आठवणींनी अगदी काठोकाठ भरून आलं होतं....ह्या सगळ्या विचारांमधे मी कधी ऑफिसच्या बाहेर पडले ते माझा मलाचं कळालं नाही...मग पहिला थेंब, दुसरा, तिसरा आणि आणि सहस्त्र जलधारा...पहिल्या पावसात मी पुरती भिजले अगदी खोल खोल आतपर्यंत...जणू तुच मला सहस्त्र धारांनी कवेत घेतलस....



प्रियांका जगदिश जोशी

http://maziblogbhoomi.blogspot.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा