
प्रती,
माननीय आदरणीय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक साहेब,
२३ जुलै आणि १ ऑगस्ट हे पुण्यदिन.
दिन असं लिहिलं कारण तीथी भारतीय आहे. दिन इंग्रजी आणि मॉडर्न आहे
आम्ही सुट्ट्यांपुरता भारतीय असतो. बाकी वेळ इंग्रजी कालगणना सोयीची असते.
प्रात:स्मरणीय लिहिणार होतो , पण रात्री सुरु होऊन प्रात:कालापर्यंत चालणार्या मद्यप्रश्नाला सामाजिक मान्यता आहे. तेव्हा प्रात:कालीन सामाजिक परिस्थिती बाकी प्रहाराप्रमाणेच असते.
तुम्हाला साहेब उपाधी लावल्याबद्द्ल क्षमस्व. तुम्हाला स्वर्गवासी (तुम्ही तरी स्वर्गातच जाल) होऊन 95 वर्षे झाली, इंग्रज जाऊन 68 वर्षे उलटतील. पण जनतेवरच उलटलेल्या नेत्यानी साहेब हि उपाधी प्रतिष्ठेची केली आहे. तेव्हा तुम्ही आमची मानसिक आर्थिक सामाजिक शासकिय आणि राजकिय गुलामगिरी समजुन घ्याल हि अपेक्षा.बघा गुलामीची सवय जातच नाही, आमच्या अपेक्षा संपतच नाहीत, त्यामुळेच देशाला भीकाऱ्यांचा देश म्हणतात का?
देश म्हणजे आसिंधु-सिंधु नाही हो. तुम्ही गेल्यावर तुमचे छायाचित्र टांगवणाऱ्या (सध्या ते ही फक्त जन्मदिन आणि पुण्यदिना पुरता दिसतात) तुमच्या नावाने पक्ष चालवणार्यानी इंग्रज आणि मुस्लिम लीगच्या कृपेने तोडुन मोडुन मिळवला ( तरी पोर्तुगीजानी दिलाच नाही, काही हजार लोक धारातीर्थी पडल्यावर निधर्मी सरकारने गोवा मुक्त केला.) बघा देश स्वतंत्र होतानाच विभक्त करुन मिळवला.. अहो 8x10 च्या खोली करता भांडणार्या सामान्य जनतेला हक्काच्या देशाची आस होती, जमिनीची किम्मत होती त्यानी बलिदान केल. महालात रहाणाऱ्यानी मिळेल तेवढा देश स्विकारला.. 150 वर्षांचा लढा 15 वर्षांच्या वाटाघाटीत (धंद्याची भाषा बोलायची तर घाटाच) संपवुन टाकला. माणस छोट्यश्या खोली साठी आयुष्यभर लढा देतात, पण उतावळ्या नेत्याना सत्तेच बाशिंग बांधायची घाई झाली..
असो. स्वातंत्र्यानंतर ताळतंत्र सोडुन लोक वागु लागले. संस्कार मर्यादा समाज सन्मान लाज निर्भयता सभ्यता ह्यांच्या व्याख्याच बदलल्या.
गेल्या 95 वर्षात विश्वास बसणार नाही असे शोध लागले. पण माणसाचा माणसावर विश्वास बसत नाही. माणुस माणसावर विश्वास ठेवत नाही पण कागदांच्या तुकड्यांवर ठेवतो. अर्थात हे गीतेत सांगितल आहेच.
तुम्ही गेल्यावर परीस्थिती तशीच राहिली. फार पुर्वी स्वकियांची गुलामी केली , नंतर मधल्या हजारो वर्षात परकियांची गुलामी केली, आता परकीय मानसिकतेच्या स्वकियांची गुलामी करतो आहोत.
तुम्ही विचारल खडसावुन कि सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय..
आता अस विचारणाऱ्याचाच ठावठिकाणा लागत नाही.
लोकशाही ही ठोकशाही बनली आहे.
राजकारण्याना **गना (***stitues) ,
रक्षकाना रक्षांगना (polistutes) ,
पत्रकाराना पत्रांगना (prestitutes) बोलतात ,
पण बोलणार्याची जीभ हासडण्याचा अधिकार असलेले तुमच्या सारखे कधीच राजकारण आणि पत्रकारितेला पोरक करुन गेले आहेत.
पुर्वी घोटाळ्यात नाव आल तर नेते आणि जनता तोंड लपवायची,
आता पत्रकार परिषदा घेतात आणि निवडणुकीच्या तयारीला लागतात
राजकारणाच्या गजकरणावर निवडून येण्याचा मलम शोधल्यावर सर्वच गोष्टी पवित्र झाल्या.
तुम्ही गेल्यावर तुमच्या नावाने जो टिळक फंड सुरु झाला होता त्यानेच सुरुवात झाली,
कि इंग्रजानी शिकवल ते त्यानाच माहिती,
पण पापाची प्रसिद्धी मिळवुन माणस थोरपदाला पोहचली.
जनतेला सरकारची कामगिरी विचारली तर "भ्रष्टाचार" सोडुन दुसर काही ऐकायला मिळण्याची अपेक्षाच नाही.
विरोधी पक्ष फक्त विरोध आणि पुढच्या निवडणुकीच्या प्रचारापुरताच उरला आहे.
लवकरच देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची तयारी सुरु होईल. पण देशात समाजात विद्वेशाच विष भिनल आहे.
मवाळ आता टवाळ झाले
जहाल तर मस्तवाल झाले.
सरकारी निधींच्या शेंगा खाऊन पुराव्यांच्या टरफलांचे राजकारण करणाऱ्यांकडून साष्टांग नमस्कार.
वॅलेंटाईन डे आठवडाभर सेलिब्रेट करण्याच्या हक्कासाठी भांडणाऱ्या पिढी आणि पाठिराख्यांच्या वतीने तुम्हाला पुण्यदिनाच्या शुभेच्छा.
ता.क. सर्व भ्रष्टाचार्यांची संपत्ती जप्त करुन जनतेला वाटली तर जनतेला अपचन होईल का? भ्रष्टाचाऱ्याना पुण्य लाभेल कि जनतेला शिव्या शाप?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा